कराची – भारतात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आमच्या संघ, प्रेक्षक आणि पत्रकारांसाठी व्हिसाबाबत लेखी आश्वासन देण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही या स्पर्धा युएईला स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी कायम ठेवू, अशी माहिती पाकिस्तानचे प्रशिक्षक एहसान मनी यांनी दिली. यासंदर्भात आम्ही आयसीसीला सूचना केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाहोर येथील पीसीबी मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एहसान मनी म्हणाले, बिग थ्रीची मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. आम्ही फक्त राष्ट्रीय संघासाठीच नव्हे तर आमच्या प्रेक्षक, अधिकारी आणि पत्रकारांसाठीही व्हिसा मिळण्यासंदर्भात लिखित आश्वासन देण्याची मागणी करत आहे.
यासंदर्भात आम्ही आयसीसीला कळविले असून भारताने मार्चअखेर लिखित आश्वासन दिले पाहिजेत जेणेकरून आम्हाला पुढील नियोजन करता येईल. अन्यथा विश्वचषक स्पर्धा भारताऐवजी युएईला घेण्याची आमची मागणी कायम राहिल. तसेच पाकिस्तानच्या संपूर्ण टीमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही बीसीसीआयने लेखी आश्वासन दिले पाहिजे, असे मनी यांनी सांगितले.