नवी दिल्ली – बीसीसीआयने देशातील युवा क्रिकेटपटूंबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांनाही केंद्रीय करार देण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे टी-20 क्रिकेट खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना चक्क दीवाळी भेटच मिळाली आहे.
खेळाडूंना करार देताना त्यांनी किमान 10 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले असले पाहिजेच ही प्रमुख अट ठेवण्यात आली आहे. यापूर्वी केवळ एकदिवसीय व कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाच बीसीसीआयच्या करारश्रेणीत स्थान दिले जात होते. आता त्यात टी-20 क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीनेही करार पद्धतीत या खेळाडूंचा समावेश केला नव्हता. मात्र, बीसीसीआयची निवडणूक झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या नव्या पदाधिकारी व कार्यकारणीच्या सदस्यांनी या करार पद्धतीत या खेळाडूंचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
अ प्ल, अ, ब व क अशा चार श्रेणींमध्ये बीसीसीआय करार पद्धती देते. या श्रेणीनुसार अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी व एक कोटी इतक्या रकमेचे करार दिले जातात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून या कराराचा लाभ भारतातील टी-20 क्रिकेटपटूंना मिळणार असून याबाबतचा सविस्तर आराखडा बीसीसीआयकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे.