नवी दिल्ली – टी-20 विश्वचषकातील सर्वात आतुरतेने ज्या सामन्याची वाट पाहिली जात आहे, तो म्हणजे 24 ऑक्टोबरला खेळला जाणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. या सामन्याची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विश्चचषक स्पर्धेतील पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध असलेली अपराजीत कामगिरी कायम ठेवण्याच्या उद्देशानेच विराट सेना मैदानात उतरणार आहे.
भारत-पाकिस्तानमधील रोमांचक सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमींनी विशेष तयारी केली आहे. या सामन्यांची तिकिटे काही तासांत संपली आहेत. तसेच देशतील अनेक शहरांतील रेस्टॉरंट, बार, हॉटेल आणि क्लबमधील बुकिंगही फुल झाली आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यानिमित्त काही ठिकाणी खास ऑफरही देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, राज्य सरकारने या आठवडयातच हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री बारा वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच काही चित्रपटगृहांमध्येही सामन्याचे थेट प्रेक्षपण दाखविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यालाही क्रिकेटप्रेमींकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषकात त्यांच्या अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी दोन सराव सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये भारताने पहिल्यांदा इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढलेले आहे.