दुबई – आयसीसीने अखेर अनेक दिवस सुरु असलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर अखेर डीआरएसला आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंजुरी दिली. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आता डीआरएसचा वापर प्रथमच होणार आहे.
2016 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत डीआरएसचा वापर झाला नव्हता. अर्थात, त्यावेळी या डीआरएस प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर इंग्लंडमधील काही काउंटी क्रिकेटमध्ये याचा वापर केला गेला होता. त्यानंतर आयसीसीने सर्वच स्पर्धांमध्ये याचा वापर करण्याचे निश्चित केले होते. मात्र, त्यापूर्वी संलग्न देशांशी चर्चाही सुरु केली होती.
त्यावर अनेक देशांची मतमतांतरे होत गेली व निर्णय रखडला होता. गेल्या वर्षी करोनाच्या धोक्यामुळे स्पर्धाही ठप्प झाल्यामुळे यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
येत्या 17 ऑक्टोबरपासून अमिराती व ओमानमध्ये या स्पर्धेला सुरुवात होत आहे. यापूर्वी महिलांच्या 2018 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत या प्रणालीचा वापर केला गेला होता.
गेल्या वर्षी जून महिन्यात आयसीसी गव्हर्निंग कॉन्सिलने क्रिकेटच्या सर्व प्रकारात प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक डावात प्रती संघ अतिरिक्त डीआरएस मंजूर केला आहे. करोनामुळे मैदानावर कमी अनुभवी पंचांची उपस्थिती पाहता, हा निर्णय घेतला गेला. यानंतर प्रत्येक संघाला टी-20 आणि एकदिवसीय सामन्यातील प्रत्येक डावात दोन रिव्ह्यू देण्यात आले.
तर कसोटीतील प्रत्येक डावात तीन रिव्ह्यू देण्यात आले. आयसीसीने विलंबित आणि पावसामुळे होणाऱ्या सामन्यांसाठी किमान षटकांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. डकवर्थ आणि लुईस निकाल मिळवण्यासाठी दोन्ही संघांना किमान पाच षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे. हा नियम उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी वेगळा असेल. या दोन सामन्यात प्रत्येक संघाला किमान 10 षटके फलंदाजी करणे गरजेचे आहे.