नवी दिल्ली – करोनाची लागण झालेले व नंतर बरे झालेल्या व्यक्तींना काही त्रास होत असल्याची नवी माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक सर्वे केला असून त्यातून ही बाब निदर्शनास आली आहे.
थकवा, अशक्तपणा, त्वचेवर चट्टे पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे अशा प्रकारचा त्रास या मुक्त झालेल्यांना होतो आहे. त्याचे सखोल परिक्षण आता केले जात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ही काही गंभीर नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. एखाद्या आजाराची लागण झाल्यावर प्रतिकारक यंत्रणेत व्यापक बदल होत असतात. औषधांचा जादा मारा झाल्यावर शरिराची यंत्रणा अति प्रतिक्रिया देउ लागते. त्यामुळेच अंगदुखी, ताप, अशक्तपणा आदी समस्या निर्माण होतात असे त्यांनी सांगितले.
प्राण्यांवरची चाचणी यशस्वी
दरम्यान, भारत बायोटेकच्या करोना लशीची प्राण्यांवरची चाचणी यशस्वी झाली आहे. माकडांमध्ये या लशीमुळे अँटीबॉडी विकसित झाल्याचे आढळून आले आहे. या चाचणीसाठी 20 माकडांची निवड करण्यात आली होती व त्यांचे चार गट करण्यात आले होते. त्यानंतर ही चाचणी घेण्यात आली होती व ती यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.