मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अडचणींचे मुख्य कारण मंत्रिमंडळ विस्तारामुळे पक्षातील आमदाराच्या नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता १५ आमदार येडियुरप्पा सरकारविरोधात बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराज झालेले आमदार एकमेकांच्या संपर्कात असून, भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यासाठी दिल्ली गाठणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात येडियुरप्पा यांचे सरकारच विरोधी पक्षातील आमदार फोडून सत्तेवर आलेले आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती होतेय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा १३ जानेवारी रोजी विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारावेळी ७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र, या विस्तारावर भाजपाच्याच आमदारांनी नाराजीचा सूर आवळला आहे. जे लोक सातत्याने सत्तेत आहेत, त्यांनाच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्री करण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या, त्या चुकीच्या आहेत.
सरकारविरोधात बंडखोरीच्या पावित्र्यात असलेले भाजपाचे १५ आमदार दिल्लीला जाण्याची योजना आखत असल्याचं बोललं जात आहे. राज्य सरकारनं वरिष्ठ मंत्र्यांना आणि विधान परिषद सदस्यांना मंत्रिमंडळातून बाहेर करावं आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. हे नवीन चेहरे पुढील दशकभर पक्षाची बांधणी करण्याचं काम करू शकतात.
मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना भाजपाचे आमदार शिवानगौडा नायक म्हणाले,”जे मंत्री २० महिन्यांपासून मंत्रिमंडळात आहेत, त्यांना आता बाजूला कराव आणि नवीन चेहऱ्यांना घेण्यात यावं. वरिष्ठ मंत्र्यांनीही पक्षासाठी काम करायला हवं आणि २०२३च्या निवडणुकीसाठी रणनिती तयार करायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.