मुंबई – मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, अश्याच एक वादग्रस्त पोस्ट मुळे केतकीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रकरण वर्षभरापूर्वीचं असलं तरी आता ठाणे कोर्टानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या केतकीवर अटकेची टांगती तलवार आहे. केतकीने ही पोस्ट १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर पोस्ट केली होती.
View this post on Instagram
केतकीची वादग्रस्त पोस्ट काय आहे –
“नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो..,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं.
तिच्या याच पोस्टवर आक्षेप घेत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी भांडूप पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दिली होती. तसंच लवकरात लवकर तिने माफी मागत ही पोस्ट डिलीट करावी, अशी मागणीही केली होती. तसेच, यापूर्वी तिने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून केतकी प्रचंढ ट्रोल झाली होती.