अत्यावश्यक सेवांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना नगरकरांचा सलाम
नगर -देशावर ओढवलेल्या करोना साथीच्या संकटातही अहोरात्र सेवा देत असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आज अवघ्या जिल्ह्याने सलाम केला. जनता कर्फ्यू दरम्यान सायंकाळी ठिक पाच वाजता घराच्या खिडकीत येऊन, गच्चीवर जाऊन तर काहींनी रस्त्यावर येवून शंख, टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून जिगरबाज कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ दिले. अवघा जिल्हा एकाचवेळी घंटा आणि थाळीनाद घुमला. यावेळी शहरात काही भागात फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संकटाशी सामना करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकत आज सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासूनच जिल्ह्यात शुकशुकाट दिसत होता.रस्त्यांवर चिटपाखरूही दिसत नव्हते.
एरव्ही गजबजून जाणारे रस्ते आज निर्मनुष्य झाले होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता करोना साथीच्या विरोधात अहोरात्र युद्ध करणाऱ्या महसूल, आरोग्य, पोलीस यांच्या अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सलाम करण्याचे मोदी यांच्या आवाहनाला देखील नगर जिल्ह्यात उर्त्स्फूत दिला. ठिक पाच वाजता गच्ची, खिडकी, अंगणात तसेच रस्त्यावर येवून नगरकरांनी टाळ्या, थाळ्या वाजविण्यास सुरवात केली.
काहींनी घंटानाद, शंख नाद, घंटीनाद करण्या सुरवात केल्याने पाच मिनिटे या नादाने अवघे नगर शहर दणाणून गेले होते. त्यावेळी काहींनी रुग्णालयात जावून येथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना गुलाब पुष्प देवून त्यांना सन्मान केला. पाच मिनिटे टाळ्या, थाळ्या, शंख नाद शहरात घुमत होता. त्यावेळी नगरकरांनी गो करोना गोचा नारा दिला.