पिंपरी – गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच यंदा तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असल्याने अनेक नागरिक, मुले, मुली पोहण्यासाठी महापालिकेच्या जलतरण तलावावर गर्दी करत आहेत. सध्य:स्थितीत महापालिकेच्या 12 जलतरण तलावांपैकी फक्त तीन जलतरण तलाव सुरू आहेत. एका तलावावर एक तास पोहण्यासाठी 80 ते 100 ची क्षमता असताना 300 ते 400 जण येत आहेत. गर्दी वाढत असल्यामुळे ऐन दुपारच्या बॅचला जलतरण तलाव बंद ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर येत आहे. त्यामुळे शहरातील बंद असलेले 9 जलतरण तलाव लवकरात-लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
राज्यासह शहरात यंदा तापमानात मोठी वाढ झाली आहे. पारा 40 च्या पुढे गेला आहे. करोनाची तिसरी लाट ओसरली असल्याने अनेक नागरिक, मुले, मुली महापालिकेच्या जलतरण तलावावर पोहण्यासाठी गर्दी करत आहेत. शहरात महापालिकेचे 12 जलतरण तलाव आहेत. मात्र, सध्या पिंपरी वाघेरे, पिंपळे गुरव आणि प्राधिकरण येथीलच तीन जलतरण तलाव सुरू आहेत.
एक तास पोहण्यासाठी फक्त 10 रुपये तिकीट दर असल्याने अनेक जण महापालिकेच्या जलतरण तलावावर पोहण्यासाठी येत आहेत. एक जलतरण तलावामध्ये एकावेळी फक्त 80 ते 100 जण पोहू शकतील, एवढीच क्षमता आहे. मात्र, 300 ते 400 जण पोहण्यासाठी येत आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी पिंपरी वाघेरे येथील जलतरण तलावावर मोठी गर्दी झाल्याने अनेक जण बॉरिकेटर्स तोडून एकाच वेळी आत घुसल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे जास्त गर्दी झाली की जलतरण तलाव दुपारच्या बॅचला बंद करण्यात येत आहेत.
ऑनलाइन तिकीट सुरू करण्याचा विचार
महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये एका वेळी पोहण्यासाठी 80 ते 100 जणांची क्षमता आहे. मात्र, 300 ते 400 जण येत असल्याने मोठा गोंधळ होत आहे. जास्त जणांना पोहण्यासाठी सोडता येत नाही. सोडले तर पाणी दूषित होते. तसेच झोपडपट्टी भागातील काही जण सकाळी अंगोळीसाठीच तलावावर येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने 1 मे पासून ऑनलाइन तिकीट सुरू करण्याचा विचार आहे.