अगदी नटूनथटून, नवीन कपडे घालून आईने दिलेल्या डबीत घरी केलेला हलवा (तो हलवा तयार करताना मदत केलेली असे.) आणि दुसऱ्या काहीशा मोठ्या डब्यात घरीच केलेल्या तिळाच्या वड्या किंवा लाडू- हे वाटण्यापेक्षा खाण्यासाठीच घेतले जात असत. वाड्यातील मैत्रिणींबरोबर तिळगूळ वाटायला जाताना चालता चालता एक एक लाडू किंवा वडी तोंडात टाकता टाकता डबी केव्हा रिकामी झाली ते कळतही नसे. घरी केलेल्या त्या खुसखुशीत आणि गोड, तोंडात घालताच विरघळून जाणाऱ्या तिळाच्या वड्यांची वा लाडवांची गोडी आजही मनात तशीच रेंगाळते आहे. आणि तशी संक्रांत साजरी करण्यासाठी पुन्हा एकदा लहान-शाळकरी व्हावे अशी इच्छा होते आहे. तेव्हा घरी केलेला तिळगूळ, खरे तर हलवा, नुसत्या तिळाचाच नाही, तर लवंगा, भोपळ्याच्या सोललेल्या बिया, बदामाचे-खोबऱ्याचे लहान लहान तुकडे, अशा अनेक गोष्टींवर काटा चढवून केलेला असे.
वाढत्या वयाच्या प्रत्येक संक्रांतीला ती लहानपणातील संक्रांत तिळाच्या लाडवांसारखीच अधिक अधिक गोड वाटत आहे.
“तिळगूळ घ्या गोड बोला’ असे सांगण्याचा हा दिवस असतो संक्रांतीचा-नवीन वर्षातील पहिल्यावहिल्या सणाचा. आणि गोड बोला असे नुसते सांगतच नाहीत, तर असे अगदी हसतमुखाने सांगतात. गोड बोला असे सांगताना हातावर गोड गोड तिळगूळ देतात. तिळगूळ घ्या गोड बोला, हे वाक्य फक्त संक्रांतीच्याच दिवशी ऐकायला मिळते. ते ही हसतमुखाने. ज्यांचे परस्परांशी पटत नाही, असे शेजारीही संक्रांतीच्या दिवशी परस्परांना हसतमुखाने तिळगूळ (किंवा काही बाबतीत तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू) देऊन गोड बोला असे अगदी हसतमुखाने सांगतात. अर्थात बोलल्याप्रमाणे पुढे म्हणजे किंक्रांतीनंतर गोड बोलतातच असे नाही. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. हा दिवस अशुभ असतो असे माझी आजी सांगत असे. आणि त्या दिवशी माझ्या वडिलांना कोठे बाहेरगावी जायचे असले तर “बाबा रे, किंक्रातीला जाऊ नकोस. पाहिजे तर आजच, म्हणजे संक्रांतीला जा किंवा मग परवा, किंक्रांत झाल्यावर जा असे अगदी आग्रहाने सांगत असे. आणि त्यांचे कितीही महत्त्वाचे काम असले तरी किंक्रातींच्या दिवशी बाहेरगावी जाऊ देत नसे.
आमच्या लहानपणी संक्रांत म्हणजे तीन दिवसांचा सण असे. संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. भोगी म्हणजे चमचमीत खाण्यापिण्याचा दिवस. भोगीची सुरुवातच व्हायची ती तिळ घातलेल्या गरम पाण्याने केलेल्या स्नानाने. पाणी तापवत असतानाच त्यात आई तिळ टाकत असे आणि मग ते कडकडीत पाणी आम्हा भावंडांना स्नानासाठी देत असे. तीळ घातलेल्या त्या वाफाळत्या पाण्याच्या स्नानाचे अप्रूप असायचे. एरव्ही आंघोळीला जायला “पहले तुम पहले तुम’ करणाऱ्या आम्हा भावंडांची भोगीच्या दिवशी स्नानासाठी पहिला नंबर लावण्यासाठी लगबग असायची.
भोगीच्या दिवशीच्या जेवणाला जी एक खास लज्जत असते, तशी वर्षभरात पुन्हा मिळत नाही. भोगीला करतात तसे जेवण इतर दिवशी केले, तरीही ती मजा, तो आनंद येत नाही. कदाचित तो त्या दिवसाचा परिणाम असावा. भोगीच्या दिवशीच्या जेवणातील खास पदार्थ म्हणजे तिळ लावलेल्या भाकरी. खास करून बाजरीच्या. भरपूर तिळ लावलेला पापड (पापुद्रा) आलेली ती गोड भाकरी आणि सोबत मिसळीची भाजी. वा! त्यांच्यापुढे पंचपक्वान्नेही फिकी पडतील. मिसळीची भाजी म्हणजे अनेक भाज्या एकत्र करून तयार केलेली चमचमीत रस्सादार भाजी. यात गाजरे, वांगी, मटार, बटाटे, शेवग्याच्या शेंगा, पावटा, शेंगदाणे, हरबरे, तिळ… असे अनेक-जवळपास डझनभर पदार्थ असत. आई ही भाजी अगदी मोठे पातेले भरून करत असे. तिळ लावलेल्या भाकरीबरोबर ती भाजी कितीही खाल्ली तरी आणखी हवीशी वाटायची. (माझा भाऊ तर नुसती भाजीच खायचा.) मग दुसऱ्या दिवशीही आम्ही तीच भाजी मोठ्या आवडीने खात असू. आणि गमतीची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी ती आणखीनच स्वादिष्ट लागत असे.
संक्रांतीच्या अशा अनेक गोष्टी असल्या तरी सार्वजनिक मोठे महत्त्व असते ते “तिळगूळ घ्या गोड बोला’ लाच!
“गोड बोला’ असे लोक परस्परांना वर्षातून फक्त एकदाच सांगतात. खरं तर असे रोज सांगितले पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे. तसे झाले तर जगातील निदान आपल्या भोवतालच्या जगातील अर्धीनिम्मी भांडणे आणि वाद निर्माणच होणार नाहीत आणि असलेली भांडणे आणि वाद अशा गोड बोलण्याने सहजपणे निकालात निघतील. पण तसे होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण एकदाच का होईना, लोक गोड गोड बोलायला सांगतात आणि स्वत:ही बोलतात हेही काही कमी नाही.
अश्विनी महामुनी