जामखेड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असलेले रोहित पवार यांची संकल्पना आणि आयोजनातून सिद्ध झालेली स्वराज्य ध्वज यात्रा राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. स्थानिकांसह राजकीय वर्तुळातही स्वराज्य ध्वजाविषयी उत्सुकता आहे. महाराष्ट्राची वीररसाने भरलेली गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या हिंदवी स्वराज्याची निश्चयी शौर्य परंपरा यांचा पुन्हा एकदा आठवण करत देशभरात हा स्वराज्य धर्माचा जागर घेऊन निघालेली स्वराज्य ध्वज यात्रा निश्चितच महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. या प्रेरणेने भरलेल्या प्रवासाचं आणि ध्येयाचं कौतुक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्र पाठवून केलं आहे.
मराठी मातीचा अभिमान असणारा हा स्वराज्य ध्वज युवा वर्गाला प्रगती व त्यागाची प्रेरणा देईल. राज्यात तसेच देशात होणा-या ध्वज पूजन व प्रवासाच्या माध्यमातून देशभरातील जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा या उपक्रमाला मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी गौरवोद्गार काढले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण किल्ल्यावर देशातील सर्वात मोठा उंच भगवा ध्वज उभारण्यात येतोय ही आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. युवा आमदार रोहित पवार यांची संकल्पना निश्चितच कौतुकास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय. हिंदवी स्वराज्याची ओळख असणारा भगवा ध्वज हा सामर्थ्याचा, बलिदानाचे प्रतिक आहे. 15 आँक्टोबर रोजी खर्ड्याच्या शिवपट्टण किल्ल्यावर होणा-या स्वराज्य ध्वज उभारणीच्या सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आज चौदाव्या दिवसाचा प्रवास सुरू असलेला स्वराज्य ध्वज हा तळागाळातून अनेक जिल्हा, शहरे, गावांमधून अडचणींची पर्वा न करता पोहोचून यशाची व कौतुकाची पावती मिळवत आहे. अवघ्या तेरा दिवसांमध्ये स्वराज्य ध्वजाने महाराष्ट्रातील एकवीस जिल्हे आणि बिहार, उत्तर प्रदेश अशा दोन राज्यांपर्यंत प्रवास केला आहे.
सुमारे दोन आठवडे उलटूनही कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून ध्वज मोहिमेचा महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू आहे. स्वराज्य ध्वजाने आतापर्यंत एकवीस जिल्ह्यांना भेट दिली आहे. या सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला उत्स्फूर्त स्वागत केले गेले आहे.
शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.
खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या विक्रमी उंचीच्या भगव्या ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीच्या उपक्रमास मुख्यमंत्री मा. @OfficeofUT साहेब आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नवी ऊर्जा देणाऱ्या आहेत. याबद्दल आपले मनापासून आभार!
धन्यवाद! pic.twitter.com/2S0ZjiIji4— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 22, 2021
महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत राज्यातील यशस्वी प्रवासाशिवाय राज्याबाहेरील दोन राज्यांमध्ये देखील हि ध्वज यात्रा पोहोचली आहे.
सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वज संकल्पनेला ध्वज मोहिम यात्रेचं मूर्त स्वरूप दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय.
दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे.
या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.
हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे.