सोलापूर, – “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ असे सांगत भक्तांना धीर देणारे व लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिराचे नुतनीकरण आणि सुशोभीकरणाचा काम वेगाने सुरू आहे. मयुरासनाच्या रुपात स्वामी समर्थांची मूर्ती बसविण्यात येणार असून मूर्ती सिंहासनावर आरूढ करण्यात येणार आहे.
मंदिराच्या निर्मितीनंतर प्रथमच स्वामींचे मंदिर पूर्णपणे नवनिर्मिती करण्याचे काम सुरू आहे. यात जो मुख्य सभामंडप आहे, त्या मुख्य सभामंडपात देखील बदल करण्यात येत आहे. स्वामी समर्थ मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण सभामंडपाचे रूप पालटणार आहे.
मंदिराचा गाभारा दगडाने बांधण्यात आला आहे. त्याला रंग दिल्यामुळे मूळ दगडी रूप नष्ट झाले होते. मात्र आता पुन्हा मूळ दगडी रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे गाभारा अधिकच खुलून दिसणार आहे. तसेच स्वामींची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. महाराजांना मयुरासनरुपी सिंहासन केले आहे. त्यानंतर महादेवाची पिंड असेल व त्यानंतर महाराजांच्या पादुका असणार आहे.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर जागृत मानले जाते. मंदिराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे हे मंदिर भाविकांना नव्या रूपात पाहायला मिळणार असल्याचे वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले.