पुणे: कोरोनाच्या संकटाकडे भारत एक संधी म्हणून पाहत आहे. भविष्यात सुनियोजन करून स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवण्यावर भर देणार आहोत. स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरवून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे आयोजित फेसबुक लाईव्ह वेबिनारमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, तसेच डॉ. जयश्री फडणवीस आदी उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, करोना या आंतरराष्ट्रीय महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. यातून सावरण्यासाठी आणि ही लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकांनी सकारात्मक विचार आणि मानसिकता बदलावी. या बिकट परिस्थितीत काही मजदूर पायी आपल्या गावी जात आहेत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जगविण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या युवकांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता हे गुण आहेत. देशाचे भविष्य सध्याच्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून आहे.
कोरोना माहामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून सरकारकडे वित्ताची कमतरता निर्माण होण्याची चिन्ह आहेत. गुणवत्ताधारक शिक्षणसाठी खासगी विद्यापीठाने पुढे यावे. उच्च शिक्षणासाठी भारतातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातात, मात्र यंदाची परिस्थिती वेगळी असेल. विद्यापीठांना त्यासाठी अपग्रेड करावे लागेल, असेही गडकरी म्हणाले.