Swachh Survekshan – स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवडला देशातील अग्रक्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी आता प्रशासनासोबत नागरिकांचाही सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. “मी माझा अभिप्राय दिला आहे, आता तुम्हीही द्या,” असे थेट आवाहन करत महापौर रवि लांडगे यांनी शहरवासीयांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांच्या मतांना विशेष महत्त्व असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा अभिप्राय हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपले मत नोंदवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विकसित होत आहे. स्वच्छतेतही शहराने देशात वेगळी ओळख निर्माण करावी, ही सर्वांची अपेक्षा आहे. प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांचा सहभाग मिळाल्यास ही मोहीम अधिक प्रभावी ठरेल. स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.” स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अभिप्राय नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षण अभिप्राय संकेतस्थळ येथे जाऊन सहजपणे अभिप्राय देता येणार आहे. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिक आपले मत नोंदवू शकणार आहेत. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनीही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या अभिप्रायाला शहराच्या प्रगतीचा आरसा म्हटले आहे. “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या गुणवत्तेचा आणि प्रगतीचा आरसा आहे. तुमच्या मतांमुळे शहरातील सेवा अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख बनू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपला अभिप्राय नोंदवून शहराच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नमूद केले. स्वच्छतेच्या स्पर्धेत देशातील आघाडीच्या शहरांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. आता या मोहिमेला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.