शेतकरी संघटनेचा इशारा : बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करा
मंचर – आंबेगाव तालुक्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तत्काळ मिळावेत. तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी. तसेच सरकार तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देणार असेल तर त्या मदतीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध असेल.
स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळप्रसंगी कायदा हातात घेवुन शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मदत न दिल्यास सरकारच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सोमवारी (दि. 4) दिला.
प्रभाकर बांगर म्हणाले, गेल्या महिनाभरापासून सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले आहे. खरिपाच्या पिकांमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, तरकारी, कांदा, बटाटा, लसूण, ज्वारी, बाजरी, मका, भात, द्राक्षबागा, फळबागा, जनावरांसाठी असलेला चारा सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये आहे.
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने मिळावी, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच सुजाता पोखरकर, उपसरपंच रशिद इनामदार, सीमा बांगर, प्रकाश इंदोरे, राजू घोडे, वनाजी बांगर, प्रवीण पडवळ, बाळासाहेब कारंडे, सचिन बागल, नवनाथ पोखरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रांत कार्यालयातील अधिकारी ज्ञानदेव शेळकंदे यांनी निवेदनाचा स्वीकार केला.