कराड – पुणे-मिरज रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम रेल्वे प्रशासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आले असून सांगली-मिरज-पुणे विभागात रेल्वे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना रेल्वेने पूर्वी घेतलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप दिला नसून नवीन भूसंपादन प्रक्रिया ही चुकीच्या पध्दतीने शेतकऱ्यांना फसवून होत असल्याचे लक्षात आल्याने कराड, कोरेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठा लढा उभा करुन रेल्वेचे काम बंद पाडले आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी रेल्वे अधिकारी, संघटना प्रतिनिधी व शेतकरी यांच्या दोन ते तीन संयुक्त बैठका घेवून चर्चेतून हा प्रश्न सोडवला असून शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करुन जेवढे क्षेत्र संपादित होईल. त्याचा मोबदला देण्याचे सांगितले आहे. तोपर्यंत रेल्वेकडून कोणतेही काम न करण्याचे आश्वासन घेण्यात आले आहे. शिरवडे, ता. कराड येथे रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी आवश्यक असलेले खांब रोवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी रेल्वेच्या ठेकेदाराची माणसे आली होती. मात्र काम सुरु केल्याची माहिती मिळताच सचिन नलवडे, शंकर आतकरे, शिवाजी चव्हाण, अनिल डुबल काम बंद करण्यास सांगितले.