नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला रामराम ठोकणारे प्रभावी नेते सुवेंदू अधिकारी यांना केंद्र सरकारने व्हीआयपी (अतिमहत्वाची व्यक्ती) बनवले आहे. त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला. त्यामुळे बंगालमध्ये फिरताना अधिकारी यांच्या समवेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) सशस्त्र कमांडो असतील. बंगालमध्ये चार ते पाच महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे.
अशात अधिकारी यांचा निर्णय तृणमूलच्या दृष्टीने मोठा राजकीय हादरा मानला जात आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता केंद्र सरकारकडून त्यांना व्हीआयपी सुरक्षा मिळण्याची घडामोड सूचक मानली जात आहे.