कारखान्यासमोर उसाचा प्रश्न; वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार
श्रीगोंदा – सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. यावर्षी ऊस नसल्याने कारखान्याचा हंगाम बंद ठेवावा लागणार आहे. मागील हंगामातील उसाची बिले जिल्ह्यात सर्वांत अगोदर देण्याचे काम नागवडे कारखान्याने केले असल्याचे यावेळी आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यस्थळावर कमी खर्चात उसाचे बेणे देखील उपलब्ध करून दिले होते, असे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.
नागवडे म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी व सभासदांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने कारखाना दरवर्षी सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करणार आहे. त्याचबरोबर माजी आ. स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या नावाने श्रीगोंद्यात तालुकापातळीवर रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प कमी खर्चात पूर्ण झाला आहे. मात्र तो पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नागवडे कारखान्याचा साखर उत्पादन खर्च देखील कमी असल्याचे अध्यक्ष नागवडे यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, सर्वांचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे. नंतर पाण्याविषयी बोलायला कोणीही तयार नाही. पालकमंत्री राम शिंदे हे कर्जत-जामखेड आमदार असल्याने खाली पाणी नेत आहेत. श्रीगोंद्याचे आमदार कुठं आहेत? ते कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत का नाहीत? विसापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदारांनी काय केले? पाण्यासाठी सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे.
कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी विषयांचे वाचन केले. त्याला सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. यावेळी प्रा. तुकाराम दरेकर, संदीप नागवडे, श्रीपाद खिस्ती, रामभाऊ मांढरे, हरिभाऊ पाचपुते, नीलकंठ जंगले, हृषीकेश भोयटे आदींची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, घनश्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, दत्तात्रय पानसरे, सदाशिव पाचपुते, राजेंद्र म्हस्के, दिनकर पंधरकर, बाळासाहेब गिरमकर, प्रेमराज भोयटे आदी उपस्थित होते. संचालक सुभाष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर योगेश भोयटे यांनी आभार मानले.