पिंपरी (प्रतिनिधी) – मित्रासोबत जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रिक्षाने उडविल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री चिंचवड येथे घडली. मात्र हा प्रकार संशयास्पद असून, झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मयत व्यक्तीच्या नातेवाइकांनी केली आहे.
दीपक सुधाकर गायकवाड (वय 32, रा. मोरया हौसिंग सोसासटी, वेताळनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ दत्ता गायकवाड (वय 20, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. लखन प्रताप थोरात (वय 28, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत दीपक आणि त्याचा मित्र शंकर तिखे हे दोघेजण रात्री दहा वाजताच्या सुमारास शतपावली करण्यासाठी पवनानगर परिसरात आले होते. शंकर हा पदपथावरून तर मयत दीपक हा पदपथालगत रस्त्यावरून चालला होता. त्या वेळी भरधाव वेगात आलेल्या आरोपी सौरभच्या रिक्षाने दीपक यास जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीपक याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र दीपक यास त्याचा मित्र शंकर याने ढकलून दिल्याने तो अचानक रस्त्यावर आला आणि त्याचा रिक्षाला धडकून अपघात झाल्याचे आरोपी रिक्षाचालक सौरभ याने सुरवातीला सांगितले. मात्र दीपक हा पदपथाच्या कडेने चालला असताना 20 फुटांचा रोड सोडून सौरभ पदपथाच्या शेजारी रिक्षा घेऊन भरधाव वेगात का आला, असा प्रश्न दीपक यांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.
तसेच दीपक अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मित्र शंकर याने त्यास रुग्णालयात नेण्याऐवजी घरी जाऊन आंघोळ केली. कपडे बदलून तो पुन्हा खाली आला. त्याच इमारतीत राहणाऱ्या दीपक यांच्या नातेवाइकास अपघाताबाबत का नाही सांगितले, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हा निव्वळ अपघात नसून याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दीपक यांच्या नातेवाइकांनी केली आहे.
जोपर्यंत शंकर याच्यावरही कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही. तसेच मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवू अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यास सोडणार नाही, असे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक गणेश आटवे यांनी दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.