मुंबई – पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव आले आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आज फक्त मराठी व बॉक्स सिनेमाच्या चालकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
दरम्यान, पेड टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर राज्यातील नेत्यांनी रिपब्लिक टीव्हीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.अशातच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील रिपब्लिकवर त्यांच्या प्रसिद्ध ‘शो’च्या नावावरून टीकास्त्र डागले आहे.
तांबे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत एका ट्विट केलं असून याद्वारे त्यांनी ‘पूछता है भारत… इसे क्या कहें?’ असा सवाल उपस्थित केला आहे. तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव घेतले नसले तरी त्यांनी रिपब्लिक टीव्हीवर त्यांच्याच ‘शो’चं नाव असलेल्या ‘पूछता है भारत’वरून लक्ष्य केलं आहे.
पूछता है भारत…
इसे क्या कहें? #TRPFraud #TRPGhotala #TRPScam
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) October 8, 2020
तांबे यांच्यापूर्वी संजय राऊत यांनीही याबाबत रिपब्लिक टीव्हीवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. ते लिहतात, “मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिक टीव्हीने टीआरपी विकत घेतल्याचा संशय असल्याचं म्हंटलं.” राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये #असत्यमेवजयते असा हॅशटॅग वापरत रिपब्लिक टीव्हीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Mumbai police commissioner held a press conference just now saying interalia that Republic TV purchased TRPs
असत्यमेव जयते!!!— Sanjay Raut (@rautsanjay61) October 8, 2020
तत्पूर्वी, रिपब्लिक वृत्तवाहिनेचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी सुशांत मृत्यूप्रकरण व त्यानंतर घडलेल्या कंगना प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये गोस्वामी यांनी केलेल्या पत्रकारितेवरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडण्यात आला होता.
हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई पोलिसांनी पेड टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्ही चालकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.