मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. भाजपच्या या 12 आमदारांना विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही. असा निर्णय घेणं असंविधानिकआहे.
भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करताना तालिका अध्यक्ष असलेले भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. भास्कर जाधव म्हणाले की, संघर्ष संपला नाही. प्रांगणात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नाही हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे.
पुढे बोलताना जाधव म्हणाले की, विधानमंडळाला संविधानानं दिलेले अधिकार आहेत. लोकशाहीत परस्पर आदर करण्याची प्रथा आहे. भाजपनं देखील आम्हाला निलंबित केलं होतं. मी भाजप आणि कोर्टाला प्रश्न विचारतो की, राज्यपालांनी 12 विधानपरिषदेच्या आमदारांची यादी प्रलंबित ठेवली आहे. राज्यपालांनी 12 आमदारांना बाहेर ठेवलं आहे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आहे, असंही जाधव म्हणाले.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलं असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.