शिर्डी (प्रतिनिधी) – काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणार्या आ.बाळासाहेब थोरातांनीच आता खुलासा करण्याची गरज असल्याचे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील, तेव्हा त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहिजे, असा टोला लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर तिळगुळ देवून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये झालेल्या गुप्त चर्चेने निवडणुकीतील सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
बीड येथील एका कार्यक्रमास जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर 10 मिनिटे थांबले होते. या दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ देवून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष दीपक पठारे, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी शहरध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, शिवाजीराजे धुमाळ उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेच्या पाठिंब्याबाबत सर्वोतोपरी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असून पक्षाकडून ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे ठामपणे सांगितले.
‘भारत जोडो’ नव्हेतर ‘काँग्रेस छोडो’ कार्यक्रम
काँग्रेस पक्षाचे नेतृत्व पक्षाच्या विचारांशी फारकत घेऊन काम करीत आहे. भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी नव्हेतर राहुल गांधीसाठीच असून, स्वत:ची छबी वाढविण्यासाठीच ही यात्रा आहे. या पक्षातून युवक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. ‘भारत जोडो’ पेक्षा ‘काँग्रेस छोडो’ हा कार्यक्रम वेगाने सुरू असल्यानेच काँग्रेसची अवस्था बिकट झाली असल्याची टीका त्यांनी केली.