नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बेशिस्त वर्तन केल्याच्या कारणावरुन विरोधी पक्षांच्या राज्यसभेतील १२ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निलंबित करण्यात आले. दरम्यान सदस्यांनी माफी मागितल्यास कारवाई मागे घेतली जाणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली होती. दरम्यान खासदारांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.
आता राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यास नकार दिला. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभात्याग करत निषेध व्यक्त केला.
“ज्या सदस्यांनी सभागृहाचा अपमान केला आहे त्यांना कोणताही पश्चाताप झालेला दिसत नाही. त्यामुळे मला वाटलं विरोधकांनी सदस्यांचं निलंबन मागे घेण्याची केलेली मागणी दखल घेण्यायोग्य नाही,” असे वैंकय्या नायडू म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी सर्व खासदारांचं निलंबन नियमाला धरुन असून प्रक्रियेचं पालन करण्यात आले असल्याचे सांगितले.
“राज्यसभेच्या सभापतीकडे कारवाई करण्याचा अधिकार असून सभागृहदेखील कारवाई करु शकतं,” असे वैंकय्या नायडू यांनी यावेळी सांगितले. पुढे त्यांनी सांगितलं की, “सोमवारी जे झालं त्यात सभापतींनी नाही तर सभागृहाने कारवाई केली. ठराव मांडून तो मंजूर कऱण्यात आला”.