शिक्रापूर (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी त्यांच्या कार्यकाला मध्ये दलालांना हाताशी धरून धरणग्रस्ताना पर्याय जमिनीचे वाटप हे संशयास्पद रित्या व बोगस पद्धतीने केले आहे. त्यांची नुकतीच बदली करण्यात आली असून त्यांची बदली करता त्यांचे निलंबन करा अशी मागणी शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांची सध्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे त्यामुळे शासनाने अशा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची स्वतंत्र एसआय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष कैलास नरके यांनी केली आहे. शासनाने शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चुकीची स्लॅब लावून अव्वाच्या सव्वा जमिनी संपादित केल्या आहे. पण बऱ्याच त्रुटी असताना असे वाटप चालू ठेवले आणि मूळ शेतकरी व शासकीय यंत्रणा यामध्ये भांडणे लावून दिली आहे.
मात्र सदर प्रकार हा चासकमान च्या नावाखाली जमिनी लाटण्याचा पॅटर्न आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांच्या कार्यकाळातील जमीन वाटप घोटाळ्याची व एजंट यांची चौकशी व्हावी. तसेच वाघमारे यांनी वाटप आराखडा सोडून इतरत्र पर्यायी जमिनी वाटप केले तसेच वीर धरणग्रस्तांना वाटप सणसवाडी येथे केले. अपात्र बोगस धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी वाटप केले आहे. शासनाच्या मान्यतेशिवाय रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्रातील जमीन वाटप केले आहे.
65 टक्के रक्कम भरलेली नसताना जमीन वाटप केले आहे. तसेच वाघमारे यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन इतर शासकीय अधिकाऱ्यांचा दमबाजी करत इतर अधिकार्याना चुकीची कामे करण्यासाठी भाग पाडले. असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी भारत वाघमारे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
माझी बदली झालेली असून मी दुसऱ्या ठिकाणी रुजू आहे – भारत वाघमारे
लोकशाही मध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार असून त्यांनी त्यांचे मत मांडलेले आहे, लोकशाही मध्ये चौकशी केल्या शिवाय कोणतीही गोष्ट नाही, त्याप्रमाणे माझी बदली झालेली असून मी दुसऱ्या ठिकाणी रुजू देखील झालेलो असून माझे कोणाशीही भांडण नाही असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.