सातारा/भुईंज – वाई तालुक्यातील खानापूरचा युवक अभिषेक रमेश जाधव (वय 30) याच्या खूनप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी एकाला ताब्यात घेतल्यानंतर भुईंज पोलिसांनी रहिम रसूल मुलाणी, प्रज्वल विजयकुमार जाधव (दोघे रा. खानापूर, ता. वाई) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातूनच संशयितांनी अभिषेकचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अभिषेकचा परखंदी गावाच्या शिवारात खून झाल्याचे आढळल्यानंतर शुक्रवारी सकाळी वाई तालुक्यात खळबळ उडाली होती. जाधव याचे आधी अपहरण व नंतर खून झाल्याने पोलिसांची याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, परखंदी गावातील काही नागरिक शेताकडे जाताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब लगेच वाई पोलिसांना सांगितली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली.
त्यांनी घटनास्थळी पंचनामा करताना मृतदेहाजवळील काही कागदपत्रावरून युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे स्पष्ट झाले. अभिषेक याचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार तो काम करत असलेल्या दुकानदाराने वाई पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर काही संशयित पोलादपूर घाटातून कोकणात गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून
पोलिसांनी संशयितांचा ठावठिकाणा शोधून त्यांना दापोली येथून अटक केली. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता यातील एका संशयिताच्या बहिणीसोबत मृत अभिषेक याचे प्रेम संबध असल्यानेच त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.
भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक शीतल जानवे खराडे व गणेश किंद्रे, पो. नि. अरूण देवकर, बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, रत्नदीप भंडारे,पोलीस अंमलदार विकास गंगावणे, शंकर घाडगे, आनंदा भोसले, जितेंद्र इंगुळकर, प्रशांत शिंदे, सचिन नलावडे, अतुल आवळे, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार तानाजी माने, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, अमोल माने, अजित कर्णे, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, स्वप्नील माने, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक यांनी ही कारवाई केली.