नवी दिल्ली – अंतराळात भारताने आज नवा इतिहास निर्माण केला. देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या ‘चांद्रयान-2’ आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला. आजच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीयांकडून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तसेच भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांनीसुध्दा या मोहिमेचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्विट करुन इस्रोच्या शास्त्रज्ञांना सलाम केला आहे. तसेच, ‘चांद्रयान-2’ च्या मोहिमेच्या पुढील यशस्वीतेसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.
I salute @Isro scientists for making India a space super power by successfully launching #Chandrayaan2. I wish the mission a grand success.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 22, 2019
दरम्यान, ‘चांद्रयान-2’ हे 15 जुलैला अवकाशात झेपावणार होते. पण तांत्रिक अडचणीमुळे हे उड्डाण लांबले होते. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मागचा आठवडाभर मेहनत करणाऱ्या शास्त्रज्ञांना के. सिवन यांनी सलाम केला आहे. उड्डाणानंतर 48 दिवसांनी ‘चांद्रयान-2’ मधील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.