प्रचारावेळी मर्यादा उल्लंघन न करण्याचे आवाहन
नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर कडवी आणि तिखट टीका सुरू केली आहे पण या धामधुमीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त टीकेवर केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
स्वराज यांनी ममता यांना दुश्मनी जमकर करो, लेकिन ये गुंजाईश रहे, जब कभी हम दोस्त हो जाये तो शरमिंदा न हो, हा शेर ऐकवत त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
ममता यांनी पंतप्रधानपदाचा आब न राखता मंगळवारी तृणमूलच्या प्रचारसभेत मोदी यांच्यावर बेलगाम टीका केली होती. मी मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजवर पाहिला नव्हता. ते बंगालमध्ये येऊन तृणमूलला लुटारूंचा पक्ष म्हणतात. मला त्यांना लोकशाहीची थप्पड द्यावीशी वाटते असे वक्तव्य केले होते.
त्यावर स्वराज म्हणाल्या, ममताजी, तुम्ही आज सर्व हद्दी पार केल्या. तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात. उद्या तुम्हाला मोदी पुन्हा सत्तेवर आल्यावर पंतप्रधान म्हणून त्यांच्याशीच बोलावे लागणार आहे. त्यासाठी बोलताना काळजी घ्या.
प्रियांकाजी, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकाराची गोष्ट सांगत दुर्योधनाची उपमा दिलीत, पण मी तुम्हाला आठवण करून देते. तुमचे बंधू राहुल गांधी यांनी यूपीए सत्तेवर असताना राष्ट्रपतींच्या वटहुकमाची प्रत फाडून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जाहीर अपमान केला होता. तेव्हा अहंकाराच्या गोष्टी विसरला होतात का? तुम्ही आता आम्हाला अहंकाराच्या गोष्टी कसल्या शिकवता, अशा कठोर शब्दांत सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना सुनावले. निवडणूकानंतरही सर्व राजकीय पक्षांचे सबंध चांगले रहावेत, असा प्रचार करण्याची गरज आहे.