नवी दिल्ली – माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी आपले सरकारी निवासस्थान रिक्त केले आहे. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना 8 सफदरजंग लेन येथे सरकारी बंगला मिळाला होता. पण आता त्या मंत्री नसल्याने त्यांनी हा बंगला रिकामा केला आहे. त्यांनी यंदाची लोकसभेची निवडणुकही लढली नव्हती. आपण ही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी निवडणुकीच्या आधीच केली होती.
नियमानुसार मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संबंधीत मंत्र्यांनी महिनाभरात आपला बंगला खाली करणे अपेक्षित असते. सुषमा स्वराज या दिल्लीच्याच रहिवासी आहेत. त्यांच्याही आधी माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपले सरकारी निवासस्थान खाली केले होते. तथापी ते राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांना त्या अधिकारात सरकारी सदनिका मिळाली आहे. सुषमा स्वराज या कोणत्याच सभागृहाच्या आता सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना सरकारी निवासस्थान मिळालेले नाही.