मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र राज ठाकरेंनी भाजपसह राज्यपालांवर थेट टीका टाळल्याचे यावेळी दिसून आले. यावरूनच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांबाबत काहीही बोलू इच्छित नाही,देवेंद्र फडणवीसांनी एकेकाळी केलेल्या अवहेलनेच्या विरोधात बोलू शकत नाही तुम्ही केवळ भावकीत जोर दाखवता अशा शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तुम्ही शत्रूला मुहतोड पद्धतीने जवाब दिला पाहिजे परंतु तुम्ही ना देवेंद्रजींना बोलू शकता ना राज्यपालांना यातच सगळं कळत. ईडीच्या नोटिशीची भीती कोणाला वाटत आहे हे आता दिसून येतंय असं स्पष्ट मत अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं. ईडीच्या नोटिशीनंतर राज भाऊंचा लाव रे तो व्हिडीओ, बंद रे तो व्हिडीओ का झाला ? याबाबत त्यांनी बोलणं अपेक्षित होत असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे नेमकं
मस्जिदीवरील भोंग्यांबाबत पुन्हा बोलणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे.
मुद्दा हा आहे की भोंगे उतरल्याने महाराष्ट्राचे कोणते नवनिर्माण होणार आहे ?
भोंगे उतरल्याने महाराष्ट्रातील गेलेलं प्रोजेक्ट परत येणार आहेत का ?
भोंग्यांमुळे रोजगार मिळणार आहेत का ? अतिवृष्टीने नुकसान झाल्याना मदत होणार आहे का ?
अशा अनेक प्रश्नाची उत्तर होकारार्थी असतील तर आम्ही देखील तुमच्यासोबत भोगे उतरायला येऊ परंतु या सर्व प्रश्नांची उत्तर नकारार्थी असतील तर तुम्ही राजकारणासाठी राजकारण हा फंडा का करता कधी तरी पक्षाच्या भवितव्यासाठी करा निव्वळ सुपारीबाज आंदोलन करण बंद करायला हवं.