मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अक्षय शिंदे हा कुणी साधूसंत नव्हता, पण एन्काउंटर चुकीचाच होता, असे त्या म्हणाल्या. आरोपीला शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे. परंतु, कुणाला तरी वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला, असा आरोप त्यांनी केला.
अक्षय शिंदे हा समाजसुधारक, क्रांतीकारी नेता नव्हता. तशीही त्याला कायद्याने सुद्धा मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा झाली असती किंवा व्हायला हवी होती. मात्र, ही शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे कायदा, न्यायालय आहे. ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त न्यायव्यवस्थेला आहे, असे म्हणत जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
अंधारे म्हणाल्या की, फेक एन्काऊंटर करण्याची गरज सरकार पक्षाला होती. निवडणुका तोंडावर होत्या, ज्या पद्धतीने भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सरकारकडून वारंवार अक्षम्य चुका होत होत्या. स्वत:चे ग्लोरिफिकेशन करण्यासाठी, उद्दातीकरण करण्यासाठी एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली, असा घणाघातही त्यांनी केला.
नाकर्तेपणा झाकण्यासाठी उचलेले पाऊल –
आपण बघितले असेल या सगळ्यानंतर ज्या पद्धतीची बॅनरबाजी केली गेली. लाडक्या बहिणींना न्याय दिला गेला, लाडक्या बहिणींचा देवाभाऊ वगैरे हे सगळे ग्लोरिफाय करण्यासाठी, आपली काळवंडत चाललेली प्रतिमा उजळ करण्यासाठी अक्षय शिंदेचा जीव घेतला गेला, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला. स्वत:चा नाकर्तेपणा हे झाकण्यासाठी, महिलांना न्याय देऊ शकत नाही, हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अगतिकतेने आणि अतार्किकपणे उचलेले पाऊल आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.