दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर ठाकरे गट आणि शिंदे गट आपापली विचारधारा आणि राजकीय धोरण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोन्ही गटांकडून प्रमुख नेत्यांची भाषणे पार पडली. ठाकरे गटाकडून सुषमा अंधारेंचे भाषण झाले. त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. त्याचबरोबर त्यांनी भाषणादरम्यान भाजपलाही चांगलेच धारेवर धरले.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मिंधे सेना तुम्ही म्हणता आनंद दिघेंचे वारसदार आहात? मग आनंद दिघेंनी राम कापसेला पराभूत करून कोणत्या पद्धतीने ठाण्याची जागा निवडून आणली होती हे विसरलात काय तुम्ही? तुमचं हिंदुत्व फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं हिंदुत्व आहे. तुम्ही वाट पाहात आहेत की सुषमा अंधारे किंवा आम्ही बोलणारे कशात सापडू. पण काळजी करू नका. तुम्ही एका संजय राऊतांवर कारवाई करू शकलात. पण शिवसेना विचार आहे. शिवसेना संपणारी नाही. शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रुजली आहेत.”
पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, “मिंधे गट तुम्ही भाजपला मित्र म्हणता ना मंग, तुम्हाला एक आव्हान आहे. तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल, तर कल्याणमधली श्रीकांत शिंदेंची जागा भाजपाला देऊन टाका. मुंबईतील प्रताप सरनाईकांची जागा भाजपाला देऊन टाका. शिरुरमधील आढळराव पाटलांची जागा भाजपाला देऊन टाका. त्याग काय ते तरी या मिंधे सेनेला कळेल.” ( Sushma Andhare at Shivaji Park strongly criticized the Shinde group Dasara Melava )
यावेळी अंधारेंनी दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या की, “दीपक केसरकर आपण फारच सो कॉल्ड बोलता. मुंबई ते गोवा जी टूर तुम्ही केली, तिचा सर्व हिशोब तुम्ही देणार होतात. त्याचा हिशोब तुम्ही अजून दिलेला नाही. संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात मेहंदीवाल्याची, ब्युटी पार्लरवाल्याचीही चौकशी केली होती. आता बीकेसीच्या मैदानासाठी १० कोटी रुपये कुणाच्या खात्यातून खर्च केले? किरीट सोमय्या, १० कोटींची चौकशी कधी करणार ते आधी बघा.” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.