सोलापूर – सोलापूर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यातील पंचतारांकित हॉटेलमधील भेटीनंतरचा वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. मंगळवारी दुपारी शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदेंना कायमचे घरी बसवले पाहिजे असे विधान करून खळबळ माजवून दिली आहे.
दरम्यान प्रचारात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मागील 70 वर्षात आम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातून आम्हाला डावलल्याने वंचित समाज पाठिशी उभा राहिला. ही निवडणूक धनगर समाज लढवतोय अशी परिस्थिती आहे. याशिवाय व्यापारी आणि इतर समाजाचे लोकही पाठिशी आहेत. विमानतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. शहरात पाण्याचा प्रश्न आहे. नियोजन केल्यास पाणी पुरवठा सुरळीत होईल. महाराष्ट्र सरकारने उजनी पाईपलाईनबाबत जुमलेबाजी केली आहे . रंगभवन ते आंबेडकर चौकापर्यंत 22 कोटी खर्चून स्मार्टसिटी झाल्याचे जाहीर केले. मात्र धुळीचा प्रश्न जैसे थेच आहे. शहरातील माती उडण्याचे प्रमाण कमी केल्याशिवाय धुळीचा प्रश्न सुटणार नाही. दोन देशमुखांमध्ये महापालिका अडकलीय. दोघांमधील भांडणे कमी करावी लागतील.
लोकशाहीची घराणेशाही जेव्हा सुरु होते तेव्हा जनतेची कामे होत नाहीत. टेक्स्टाईल इंडस्ट्री ही आजारी इंडस्ट्री आहे. ही इंडस्ट्री क्राईम इंडस्ट्री झाली आहे, त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंना कायमचे घरी बसवले पाहिजे, असे आंबेडकर यांनी सांगितले.
भाजपने मराठ्यांना आरक्षण दिले त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला. ओबीसीला आपले 27 % आरक्षण गेल्याची भिती वाटतेय. ओबीसी आणि मराठा समाजातील वाद मिटावे असे वाटते. पुढील निवडणूक लढवण्यासाठी आधी जिवंत राहावे लागते. मी भविष्यात जगत नाही वर्तमानात जगतो. कॉंग्रेस पुर्णपणे संघाच्या ताब्यता गेली. ती मोदीच्या इशाऱ्यावर नाचते आहे. संघाविरोधात देशभरात आवाज उठवणारा माझ्याशिवाय कोणीही नाही. त्यामुळे मुस्लिम माझ्यासोबत आहे, असेही आंबेडकर म्हणाले.