नवी दिल्ली -अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण बिहार पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. तर, पाटण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा वैध असल्याचा दावा बिहार सरकारकडून करण्यात आला.
सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाशी संबंधित गुन्हा त्याची अभिनेत्री मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात बिहारच्या पाटणा पोलिसांनी दाखल केला आहे. तो गुन्हा मुंबईत वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका रियाने दाखल केली आहे. त्यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.
त्याआधी झालेल्या सुनावणीवेळी महाराष्ट्र आणि बिहार सरकारांनी त्यांची बाजू मांडली. संबंधित प्रकरणात महाराष्ट्राचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप बिहार सरकारकडून करण्यात आला. मुंबई पोलिसांनी पाटणा पोलिसांना सुशांतचा शवविच्छेदन अहवाल दिला नसल्याचा दावाही त्या सरकारने केला.
तर, मुंबई पोलिसांकडून योग्य दिशेने तपास सुरू नसल्याचा आरोप सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी केला. आता न्यायालयाने सुशांतचे वडील तसेच महाराष्ट्र आणि बिहार सरकारांकडून रियाच्या याचिकेवर 13 ऑगस्टपर्यंत लेखी उत्तर मागवले आहे.