नागपूर – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने 19 ऑगस्ट 2020 रोजी घेतला. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन चार ते पाच महिने झाले, तरी सीबीआयने ( CBI ) अजूनही सुशांतसिंगची आत्महत्या होती की हत्या याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. नागरिकांना या प्रकरणाबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सीबीआयने या तपासाबाबत लवकरात लवकर खुलासा करावा,अशी मी विनंती करतो. असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआयवर निशाणा साधत पुढं म्हटले की, “महाराष्ट्रातले तसेच महाराष्ट्राबाहेरचे लोक अतिशय उत्सुकतेनं सीबीआयच्या या तपासाची वाट पहातायेत की कधी एकदा सीबीआयचा तपास समोर येतो. त्यामुळं ही आत्महत्या होती की त्याची हत्या करण्यात आली याबद्दलचं सत्य जनतेसमोर येईल. आज राज्याचा गृहमंत्री म्हणून लोक मला सातत्यानं विचारतात की या केसचं काय झालं. त्यामुळं सीबीआयनं याचा लवकरात लवकर खुलासा करावा.”