मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला एम्सच्या अहवालामुळे नवे वळण मिळाले आहे. एम्सने सीबीआयला सादर केलेल्या अहवालात सुशांतचा खून झाला असल्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्याने सुशांतची आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी याबाबत टिपणी करताना शिवसेनेला, ‘एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका’ असा सल्ला दिला आहे.
याबाबतची भूमिका मांडताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर खात्यावर त्यांनी, “SSR केसच्या AIIMS अहवाला नंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.” अशी भूमिका मांडली आहे.
SSR केसच्या AIIMS अहवाला नंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 5, 2020
दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्युबाबत एम्सने सादर केलेल्या अहवालावरून विरोधकांवर चांगलाच निशाणा साधण्यात आला आहे.
सामानातील अग्रलेखातून टीकास्त्र
“सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. ‘ठाकरी’ भाषेतच बोलायचे तर सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता; पण शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले? सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले.”
“याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱयांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱया गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळय़ांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारने अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे.”