पिंपोडे सर्कलमधील सरपंचाशी साधला संवाद
वाड्या-वस्त्यांवर फिरणारे बहुधा पहिलेच जिल्हाधिकारी
सातारा – नांदवळ तलावात चार विहिरी खोदण्यात आल्या असून या विहिरींमध्ये वसना-वांगना उपसासिंचन योजनेचे पाणी सोडले जात आहे. या विहिरींमधील पाणी नांदवळ, सोळशी, नायगाव व सोनके या गावांना पिण्यासाठी देण्यात येत आहे. या नांदवळ तलावावरील नळ पाणीपुरवठा योजनेची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पाहणी करून 31 गावांच्या सरपंचांशी संवाद साधला.
नांदवळ तालावात चार विहिरी भोवती चर खोदून ते पाणी पाझराद्वारे विहिरीत सोडले जात आहे. चरांमध्ये त्यात पाझर फुटणारा भराव टाकावा, अशी मागणी सरपंचांनी केली. या चरांमध्ये तात्काळ वाळू टाकावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिले. रणदुल्लाबाद गावाला उच्च दाबाने पाणी मिळत नसल्याचे तिथल्या सरपंचांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी या गावाला उच्च दाबाने पाणी मिळावे यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शेंदूरजणे गावाला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे, तेथील सार्वजनिक विहिरीचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांनी सादर करावा त्याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल. रामोशीवाडी गावच्या सरपंचांनी जिहे-कठापूर योजनेचे पाणी मिळाले तर गावची कायमस्वरूपी पाण्याची समस्या मिटेल, असे सांगितले. यावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी रामोशीवाडीला तांत्रिकदृष्ट्या जिहे-कठापूरचे पाणी देणे शक्य नाही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र प्रस्ताव द्यावा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे सांगितले.
टंचाईच्या काळत पाण्यावाचून एकही गाव वंचित राहणार नाही. गावच्या मागणीनुसार टॅंकरने पाणीपुरवठा केला जाईल. नायगाव या गावाला सध्या 3 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जादाची मागणी आल्यास तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून लवकरात लवकर टॅंकर सुरू करावेत. तसेच पशुधन अधिकाऱ्यांनी उपलब्ध चाऱ्याची पडताळणी करून अहवाल सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या. यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी वडूथ येथील टॅंकरची फिडीग पॉईंटची पाहणी करून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी कोरेगावच्या तहसीलदार शुभदा शिंदे, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्यासह नांदळवळ, रामोशीवाडी, पिंपोडे, राऊतवाडी, मोहितेवाडी, बनवडी, सोळशी भावेनगर आदी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
टंचाईच्या काळात लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल ह्या वाड्यावस्त्यांवर जात आहेत, बहुधा या पहिल्याच अशा जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे बऱ्याच टंचाईच्या समस्या त्यांनी दूर केल्या आहेत. टंचाईच्या काळात जिल्हा प्रशासन संवेदनशिल तत्परतेपणे काम करीत आहेत.
मंगेश धुमाळ , जिल्हा परिषद सदस्य