सातारा – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाधित आणि मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाची “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यशस्वी करुन करोना नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांनी केले. सातारा तालुक्यात 163 पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा पंचायत समितीमध्ये या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सौ. इंदलकर बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी सौ. सुवर्णा चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढमाळ, डॉ. एम. पी. रायबोले, स्वप्निल धर्माधिकारी आदी उपस्थित होते. तालुक्यात करोना बाधित आणि मृत्यूचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे.
प्रशासन युध्दपातळीवर सर्व उपाययोजना करत असले तरी बाधितांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवल्यास बाधितांचे प्रमाण तसेच मृत्यूदरही नियंत्रणात येणार आहे. या मोहिमेत प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांचा सहभाग राहणार आहे. ग्रामस्थांनी सर्व्हे करणाऱ्या कर्मचारी, स्वयंसेवकांना सहकार्य करण्याची गरज आहे. सातारा तालुक्यात 163 तर शहरात 45 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा असल्याचे सौ. इंदलकर यांनी सांगितले. गृहभेटीद्वारे संशयित रुग्ण शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. करोना प्रतिबंधाबाबत आरोग्य शिक्षणही देण्यात येणार आहे. नागरिकांनी गृहभेटीदरम्यान सहकार्य करुन सत्य माहिती सांगावी, असे आवाहन डॉ. डी. जी. पवार यांनी केले.
ग्रामीण भागात तीन सदस्यीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही मोहिमेमुळे करोना काही अंशी तरी नियंत्रणात येईल, असा विश्वास सौ. सुवर्णा चव्हाण यांनी व्यक्त केला. या मोहिमेत अतिजोखमीच्या लोकांची तपासणी होणार असून त्यांना उपचार व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. वाढता मृत्यूदर कमी आणण्यात ही मोहीम फायदेशीर ठरणार असल्याचे संजय ढमाळ यांनी सांगितले.