नवी दिल्ली – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील नागरी हक्कविषयक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी आठवड्याभरात आत्मसमर्पण करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. महाराष्ट्रातील न्यायालयांचे कामकाज सुरू असल्याने हा कालावधी आणखीन वाढवला जाऊ शकणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नवलखा आणि तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाने 16 मार्च रोजी तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तुरुंगातील वातावरण धोकादायक बनल्याच्या कारणाने या कालावधीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे आणि तीन आठवड्यात तुरुंगाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र आरोपींनी प्रत्यक्षात आत्मसमर्पण केलेले नाही. मुंबईतील न्यायालयांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. आरोपींना अटकेपासूनचे संरक्षण बऱ्याच काळापासून दिले गेलेले आहे.
आत्मसमर्पण करण्याच्या कालावधीला एका आठवड्याची मुदतवाढ दिली जात आहे. न्यायालयाच्या या आदेशाचा मान राखण्यात यावा आणि या कालावधीत आत्मसमर्पण करण्यात यावे, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली. आत्मसमर्पणाच्या कालावधीला यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.