नवी दिल्ली- देशभरात स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल सुरू असून त्या प्रकरणात केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करीत कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सुर्जेवाला यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे.
सुर्जेवाला हे कॉंग्रेसचे अधिकृत राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. ते म्हणाले की या याचिकेद्वारे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर काही महत्त्वपूर्ण उपाय आम्हाला कोर्टापुढे नमूद करता येतील आणि ते त्यांच्या मार्फत सरकारला सांगता येतील. त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करणेही त्यामुळे शक्य होईल.
स्थलंतरित मजुरांचा विषय गंभीर आहे. कोट्यवधी लोकांचे यात हाल झाले आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकारने विरोधी पक्षांना विचारातच घेतले नाही किंवा त्यांच्या सहभागाने कोणत्याही समित्या त्यांनी स्थापन केलेल्या नाहीत. सरकार त्यामुळे विरोधी सदस्यांचे काहीच ऐकत नाही व ते स्वताही या विषयी उपाययोजना करण्यास साफ असमर्थ ठरले आहेत असे सुर्जेवाला यांच्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
हे स्थलांतरित मजूर त्यांच्या जिल्ह्यात किंवा गावी पोहचल्यानंतर त्यांचा स्वीकार करण्यासाठी सरकारने जिल्हा स्तरावर आणि गाव स्तरावर रिसेप्शन सेंटर्स स्थापन करावीत या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी त्यांनी उपाययोजना करावी अशी मागणीही त्यांनी त्यात केली आहे. अजूनही लक्षावधी स्थलांतरीत मजूर ठिकठिकाणी अडकून पडले आहेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार साफ अपयशी ठरत असल्याचा आरोप कॉंग्रेस कडून रोजच केला जात आहे.