मुंबई – केंद्राचा एखादा मंत्री जर अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानावर तातडीने सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती अस्थिरता आणि अशांतता निर्माण करत असतील तर हे वक्तव्य फार गांभीर्याने घेतले पाहिले. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून मुंबईत पत्रकारांशी बोलतांना राऊत यांनी जोरदार टीका केली.राऊत म्हणाले, संपूर्ण देश चिंतेत आहे की लाखो शेतकरी सिंधू बॉर्डरवर लढत आहेत.
सरकारला खरंच तोडगा काढायचा असता तर तोडगा निघाला असता. पण बहुधा सरकारला हा विषय असाच लोंबकळत ठेवायचा आहे. महाराष्ट्र, पंजाब तसेच इतर सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सारख्याच आहेत. सरकारला कायदा आणि शेतीच्या कायद्यात काही बदल हवे असतील तर भाजपशासित राज्यांमधून सुरुवात करावी. तिकडे प्रयोग करावा, काय परिमाण होतो ते पाहता येईल आणि त्यानंतर इतर राज्यं स्वीकारतील. कदाचित पंजाबही स्वीकारेल, असेही ते म्हणाले.
दानवेंकडून शेतकऱ्यांचा अपमान – बच्चू कडू
सर्व देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे म्हणणे शेतकऱ्यांचा अपमान आहे.
रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्या असून त्यांना घरात घुसून फटकवायला हवे, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दानवे यांच्यावर सडकून टीका केली.
तसेच रावसाहेब दानवे हे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे हे समजण्यासाठी त्यांचा डीएनए तपासणे गरजेचे असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.