सुरेश रैनाचा एमएसके प्रसाद यांच्यावर पलटवार
नवी दिल्ली – भारतीय संघातून बाहेर काढल्यानंतर तत्कालीन निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी माझ्याशी कधीही चर्चाच केली नाही, असा खुलासा सुरेश रैना याने केला असून प्रसाद हे माध्यमांना खोटे सांगून दिशाभूल करत आहेत, असा पलटवारही रैनाने केला.
करोनाच्या संकटामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याने या स्पर्धेत सरस कामगिरी करत भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान मिळविण्याच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत असून त्यात भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी मी खूप आशावादी होतो. मात्र, स्पर्धाच होणार का नाही असा प्रश्न निर्माण झाल्याने खूप निराश झालो, असे रैनाने व्यक्त केले.
2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर रैनाला भारतीय संघात संधीच मिळाली नाही. त्याला आयपीएलमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यावेळी त्याने प्रसाद यांच्यावर टीका केली होती. अजून सरस कामगिरी कर तरच संघ निवडीत विचार करू असे प्रसाद यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर इतक्या वर्षात त्यांनी किंवा निवड समितीतील एकाही सदस्याने माझ्याशी कधीही चर्चा देखील केली नाही. प्रसाद यांनी माझ्याशी चर्चा झाल्याचे सांगितले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. जी गोष्ट घडलीच नाही ती माध्यमांना सांगून ते दिशाभूल करत आहेत, असेही रैनाने स्पष्ट केले.
रैनाची कामगिरी खूपच सुमार झाली. तसेच त्याला वारंवार संधी देऊनही त्याची कामगिरी सुधारली नाही त्यामुळेच त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यावेळी कामगिरीत सुधारणा कर तरच संघात पुनरागमन करण्याची संधी मिळेल असे रैनाला सांगितल्याचे प्रसाद यांनी म्हटले होते. मात्र, आमच्यात अशी कोणतीही चर्चाच झाली नसल्याचे सांगत रैनाने पुन्हा एकदा प्रसाद यांना अडचणीत आणले आहे.