राजगुरूनगर येथील सभेत आढळराव पाटील यांचे वक्तव्य
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा आमदार कसा असावा हे दाखवून देणारा आमदार आपल्याला मिळाला आहे. कोणी कितीही गर्जना केल्या तरी सुरेश गोरेच पुन्हा आमदार होतील, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क नेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राजगुरूनगर येथे जाहीर सभेत व्यक्त केला.
आमदार सुरेश गोरे यांनी शुक्रवारी (दि. 4) जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या सभेत आढळराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, जिल्हा संघटक विजया शिंदे, अशोक खांडेभराड, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, बाबाजी काळे, उपतालुका प्रमुख संजय घनवट, शेखर शेटे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, अमर शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर सदस्य अंकुश राक्षे, आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोषनाना डोळस, राजू जवळेकर, रामहरी आवटे, किरण मांजरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा घेण्यात आली त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सभेच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आला मात्र, या पावसातही सभा सुरूच राहिली त्यानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, आमदार कसा असावा त्यांनी काय विकास केला हे 5 वर्षांत आमदार गोरे यांनी जनतेच्या समोर दाखवून आहे. मी आमदार गोरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. गोरेच पुन्हा आमदार होतील ते येत्या 21 तारखेला जनता मतदानातून दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले आभार तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी मानले.
खेड तालुक्याची गुंडगिरी बंद केली, विकास काम काय करावे हे विरोधकांनी सांगू नये. विकास पाहायचा असेल तर माझ्याकडे पहा. जनतेला गुंडगिरी पाहिजे असेल तर त्यांच्याकडे बघा. 5 वर्षांत तालुक्यात शांत आहे. मी शिवसेनेचा आमदार आहे. आमच्या नादी लागू नका. तुम्ही जेवढी खालच्या पातळीवर टीका कराल त्यापेक्षा खालच्या पातळीवर आम्ही टीका करू.
– सुरेश गोरे,आमदार
डोळस यांचे आठवले स्टाईलने भाषण
“गुंडांना करूद्या बंड, शिवसेना करील त्यांना थंड..आता पडतील पावसाच्या धारा खेड आळंदीत शिवसेनेशिवाय कोणाला नाही थारा… खेड तालुक्यात म्हणतात आमदार पाहिजे नवा, पण मतदार म्हणतात आम्हाला सुरेश गोरेच आमदार हवा… आदी चारोळ्या म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची स्टाईलचे भाषण संतोषनाना डोळस यांनी केले.