रामदास धवटे : काळूस येथे जन आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
राजगुरूनगर – खेड तालुक्यात विकास कामे आणि शांतता राखणारे लोकप्रतिनिधी म्हणून गावागावांतील नागरिकांमध्ये आमदार सुरेश गोरे यांचे नाव घेतले जाते, त्यामुळे आमदार गोरेंचाच पुन्हा विजय होणार, असा विश्वास तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी व्यक्त केला.
खेड-आळंदी विधासभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांची तालुक्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. यानिमित्ताने काळूस येथे आयोजित कार्यक्रमात धनवटे बोलत होते. यावेळी आमदार सुरेश गोरे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, प्रकाश वाडेकर आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष डोळस, लक्ष्मण जाधव, केशव अरगडे यांच्यासह मोठा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. काळूस, माळवाडी, पोटवडेवस्ती पवळेवस्ती, कौटकरवस्ती वाटेकरवाडी, पवळेवाडी, बंगलावस्ती, जाचकवाडी, गणेशनगर, कदमवस्ती, वाकी बुद्रुक, रासे, धानोरे, सोळू, पिंपळगाव, गोलेगाव आदी गावातून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदारांनी खेड तालुक्यात पाच वर्षांत विविध विकासकामे केली. जे प्रश्न 15 वर्षांत सुटले नाहीत. ते 5 वर्षांत सोडविले. तालुक्यातील गुंडगिरीचे समूळ उच्चाटन केले आहे. त्यामुळे तालुक्यात शांतता नांदत आहे. सर्वसामान्य नागरिकाला जो शाश्वत विकास हवा आहे, तो केला आहे.
अजूनही मला मोठा विकास करायचा आहे. तालुक्यात अडलेले प्रश्न सोडवायचे आहे. राज्यात आणि देशात सरकार असल्याने आगामी काळात मोठा निधी मिळणार आहे. त्यामुळे नागरिक विकासाच्या बाजूला उभे राहतील. शिवसेनाच हा गड राखणार असल्याचे चित्र असल्याने विरोधक भावनिक आवाहन करू लागले आहेत. मात्र, त्यांना जनता कदापि स्वीकारणार नाही.
विकासकामांच्या जोरावर आमदार सुरेशभाऊ गोरे हेच तालुक्याचे आमदार होणार आहेत. हे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी दाखवून दिले आहे. मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी त्यांचा विजय निश्चित आहे.
-ज्योती अरगडे, सदस्य, खेड पंचायत समिती.