पुणे -दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पुण्यात आंदोलन केल्यानंतर लगेच खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी आज दिले आहे.
दिव्यांग बांधवाना आणि “वयोश्री’ योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी खा. सुळे या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसल्याने सोमवारी (दि. 30 जून) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर सुळे यांनी दिल्ली येथे सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदार संघात “वयोश्री’ योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर आयडीआयपी योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी आहेत.त्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून, सहाय्यभूत साधने वाटप करायची आहेत. त्यासाठी साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून वितरित करावे, अशी मागणी खासदार सुळे यांनी सामाजिक न्यायमंत्री कुमार यांची भेट घेऊन केली. सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून दिव्यांग बांधवाना आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन कुमार यांनी दिले अससल्याचे सुळे यांनी सांगितले.