मुंबई : राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे नुकतीच राज ठाकरेंनी सिने अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेली मुलाखत. मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्यास तयारी दर्शवली. या मुलाखतीनंतर राज्यात ठाकरे बंधूं एकत्र येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या सगळ्या घडामोडीवर आता खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आमचे आणि ठाकरे कुटुंबाचे पाच- सहा दशकापासून कौटुंबिक संबंध आहेत. राज आणि उद्धव आमच्या कुटुंबासाठी आजही प्रिय आहेत. जर बाळासाहेब आजचा हा दिवस बघण्यासाठी असते तर खूप आनंद झाला असता असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक, इतिहासातला सोनेरी दिवस आहे.
तसेच दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण मोठ्या मनाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे असे सुप्रिया सुळे म्हणल्या. ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पवारांनी एकत्र यावे का? असे विचारले असता त्या म्हणाल्या पांडुरंगाची इच्छा. नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आजही आणि उद्याही.