मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिकांवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. या सदनिका सील केल्या असूनही त्याचे बाजारभावाने मुल्य सहा कोटी 45 लाख रुपये आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींभाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्र सरकारने तपासयंत्रणांना हाताशी धरून सूडसत्र चालवले आहेवर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या,’मोदी सरकारला देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण निवडक लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करायला हवी.’
त्या पुढे म्हणाल्या,’भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्र सरकारने तपासयंत्रणांना हाताशी धरून सूडसत्र चालवले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून या विषयी प्रश्न विचारणार आहे की, भाजप नेत्यांनावर किंवा भाजप पक्षात आलेल्या नेत्यांवर कारवाई का केली जात नाही?’ असं म्हणत सुळे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.