नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले 18 दिवस दिल्लीच्या सीमांवर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने हटवण्यासाठी प्रशासनाला सुचना देण्याबाबतच्या याचिकेवर 16 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुख्य न्यायाधिश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम् यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. रस्ते रोखल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने करोना प्रसाराची भीती आहे, अशी मांडणी करणारी याचिका विधी शाखेचा विद्यार्थी असणाऱ्या वृषभ शर्मा याने दाखल केली आहे.
नव्याने केलेल्या तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी शेतकरी गेले 18 दिवस दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. त्यांच्याशी सरकारने चर्चा केली मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर सरकारविरोधात असंतोष व्यक्त होत असल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या या याचिकेला महत्व आले आहे.