मुंबई – मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेतेपद हे कॉंग्रेसकडेच राहणार असल्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. बीएमसीतील विरोधीपक्ष नेतेपद भाजपला मिळावे, या मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राजकारणात रोज हेच होते. आज आपण कोणाचे मित्र असू, तर उद्या त्याचे मित्र नसू, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.
मुंबई महापालिकेत भाजप दुहेरी भूमिका घेत असत. आधी पहारेकरी होते, आता विरोधी बाकावर बसण्याचा प्रयत्न होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भाजपची मोठी हार झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी दिली.
भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असल्याने आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. तेव्हा उच्च न्यायालयाने ती मागणी नाकारली होती. त्यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात याबाबत अर्ज केला होता. मात्र ही याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
कॉंग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 1
अभासे – 1
शिवसेना काय निर्णय घेणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते. शिवसेना मुंबई महापालिकेतील 227 पैकी दोनशेहून अधिक जागा दशकानुदशकं स्वबळावर लढवत आली आहे. त्यामुळे यंदा शिवसेना पूर्णपणे स्वबळावर लढणार, की राष्ट्रवादीशी घरोबा करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.