नवी दिल्ली – पीएमसी बँकेतील खातेधारकांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का बसला आहे. खातेदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी खातेदारांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला न्यायाधीशांनी दिला आहे. त्यामुळे पीएमसी खातेदारांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्लीच्या बीके मिश्रासह काही जणांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत बँकांच्या ठेवी आणि ठेवींच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या पाहिजेत. तसेच १५ लाख खातेदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्यासाठी १०० टक्के विमा संरक्षण मागितले गेले होते.
दरम्यान, ११,६०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या पीएमसी देशातील पहिल्या १० सहकारी बँकांपैकी एक आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर आर्थिक निर्बंध लादले होते. यामुळे पीएमसीचे ठेवीदार त्यांच्या बँकेतून पैसे काढू शकत नाहीत. पीएमसी ग्राहक खात्यातून फक्त २५,००० रुपये काढता येतात.