नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे नेते संजयसिंह यांच्यावर उत्तरप्रदेशात द्वेषमुलक भाषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर कोणतीही अटकेची कारवाई करण्यासही सुप्रिम कोर्टाने मनाई केली आहे.
संजयसिंह यांच्यावर गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी पत्रका परिषद घेऊन उत्तरप्रदेश सरकारने विशिष्ट जातींनाच लाभ दिल्याच्या आरोपाच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही गुन्हे एकत्र करून ते रद्द करण्यात यावेत अशी मागणी संजयसिंह यांनी आपल्या याचिकेत केली होती.
त्यावर उत्तरप्रदेश सरकारने त्यांची भूमिका सादर करावी अशी नोटीस कोर्टाने आज जारी केली. न्या अशोक भुषण आणि न्या आर. एस. रेड्डी यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. त्यावेळी समाजात द्वेष भावना निर्माण होईल किंवा जात धर्मांमध्ये भेदभाव निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळण्याची सुचना कोर्टाने संजयसिंह यांना केली.
आपण राज्यसभा सदस्य असून आपल्यावर खटला दाखल करण्यास राज्यसभेच्या अध्यक्षांची अनुमती आवश्यक असल्याचा दावा संजयसिंह यांच्यावतीने आजच्या सुनावणीच्यावेळी करण्यात आला होता.
त्यावर कोर्टाने म्हटले आहे की आपल्या विरोधातील गुन्ह्यांना राज्यसभेच्या अध्यक्षांची संमती नाही याचा अर्थ आपल्या विरोधात गुन्हाच दाखल करायचा नाही असे होत नाही. राज्यसभेच्य अध्यक्षांची अनुमती या मुद्द्यावर नंतरच्या टप्प्यात सुनावणी घेतली जाईल असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.